मंगला काकू
मंगला काकू आज गेली. त्याबरोबरच त्या पिढीचा शेवटचा दुवा निखळला. माझे तीन काका (जयंत काका, शाम काका, मोठे काका), आणि आत्या. आता सगळे काळाच्या पडद्याआड गेले. अरविंद दादा त्या आधीच गेला. तसं म्हणलं तर काळाच्या पडद्याआड सगळ्यांनाच जायचंय. आज की उद्या हाच प्रश्न.
मंगला काकू ही अतिशय म्हणजे अतिशयच प्रॅक्टिकल होती. मी आणि ताई लहानपणी खूप वेळा अंबरनाथ ला त्यांच्या कडे जायचो. कधी कधी रहायला पण. जयंत काका जत्रेला घेऊन जायचे ते चांगलं आठवतंय. मंगला काकू पहिल्यापासूनच बोलायला एकदम प्रॅक्टिकल आणि सरळ. मागच्या वेळेला भारतात आलो होतो तेव्हा भेट झाली होती. तिच्याकडेपुष्कळ पैसे होते. ती पैशे म्हणायची. मला म्हणाली, मी देऊन टाकले पैशे. आता मला काय करायचेत! आता सुनील बघून घेईल!
आणि एक तिचं वाक्य म्हणजे "आमच्याकडे काही वाघिणी फुटल्या आहेत का" ?
तसं म्हणलं तर मी आणि ताई, आम्ही अर्ध्या पिढीच्या अंतरावर आहोत. सुनील दादा, अरविंद दादा, अनिल दादा हे आमच्या वर अर्धी पिढी आणि शंतनू सुशांत वगैरे आमच्या अर्धी पिढी खाली. त्यामुळे असेल कदाचित पण मंगला काकू आणि जयंत काका हे म्हणजे जास्ती जवळ वाटायचे. शाम काका आणि मोठे काका हे जवळ असले तरी पिढीच्या दृष्टीने लांब. शिवाय पुण्यापेक्षा अंबरनाथ जवळ. त्यामुळे जास्ती जाणं व्हायचं.
मला सगळ्यात जास्ती आठवणारी गोष्ट म्हणजे मंगला काकू आणि जयंत काकांनी बदललेली घरं! मला त्यांचं बदलापूरचं घर अजिबात आठवत नाही. पण अंबरनाथ मध्ये त्यांनी अनेक घरं बदलली. एक अगदी स्टेशनच्या जवळ होतं. एक अगदी लांब. मग रेल्वे लाईन च्या समोर होतं. तिथेच शंतनू आणि सुशांत चा जन्म झाला असावा. मग एक आत्त्ता आहे तिथेच तळमजल्यावर होतं. आणि मग आत्ता आहे ते. मी एखादेवेळेला दोन तीन घरं मिस केली असतील!
आत्ताच्या घरात मंगला काकू खूष होती. उजेड, हवा या सगळ्या दृष्टीतून हे घर उत्तम. शिवाय ती दिवसातून एकदा खाली जाऊन बसायची, शक्य होतं तो पर्यंत.
मंगला काकू पूर्ण आयुष्य जगली, उत्तम रीतीने जगली. कृतार्थ.
Comments
Post a Comment